नागपूर: तरुण-तरुणींवर नागपूर पोलिसांनी केला लाठीमार
नागपूर : रविवारी चँम्पीयन ट्रॉफीमधील अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझिलँड संघादरम्यान खेळला गेला. शेवटच्या षटकापर्यंत पोहचलेल्या या सामन्यात क्रिकेटप्रेमींची उत्सूकता शिगेला पोहचली होती. दोन्ही संघ तुल्यबळ असल्यामुळे कोण जिंकणार याबाबत क्रिकेट प्रेमींच्या मनात शंका होती. क्रिकेट सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय फलंदाजांनी बाजी मारुन सामना खेचून विजयश्री मिळवली.
भारतीय क्रिकेट संघाने चँम्पीयन ट्रॉफी जिंकताच क्रिकेटवेडे तरुण-तरुणी नेहमीप्रमाणे लक्ष्मीभवन चौक आणि धरमपेठमध्ये पोहचले. रात्री बारा वाजेपर्यंत क्रिकेट प्रेमींनी जल्लोष केला . कुणी फटाके फोडून आनंद व्यक्त करीत होते. पाहता-पाहता चौकात जवळपास एक हजारापेक्षा जास्त तरुणाई गोळा झाली. त्यांनी आनंदोत्सव सुरु केला. मात्र, काही वेळातच तरुणाईने मर्यादा ओलांडून फटाक्यांती आतिषबाजी करीत गोंधळ घातला.

काही असामाजिक तत्वांनी फटाके पेटवून तरुणींच्या दिशेने फेकले. त्यामुळे धावपळ झाल्याने तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच अंबाझरी आणि सीताबर्डी पोलीस पथकासह तेथे पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. रात्री १ वाजता काही क्रिकेटप्रेमींना पोलिसांचे दंडुके खावे लागले. तसेच काही तरुणांना अंबाझरी पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.


