१६ वर्षापासून चिंचघाट प्रकल्प रखडल्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक : अधिकाऱ्यांना दिला सक्त कारवाईचा इशारा
नागपूर : जिल्ह्यातील चिंचघाट उपसा सिंचन योजनेला 16 वर्षांपूर्वी मंजुरी मिळूनही प्रकल्प पूर्ण न झाल्याने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. दुष्काळी भागातील विदर्भातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्वाच्या असलेल्या या योजनेसाठी कोणत्याही निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही देत प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दिरंगाई किंवा दुर्लक्ष झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. महसूल मंत्र्यांच्या दालनात चिंचघाट उपसा सिंचन योजना आणि राज्यातील नदी-नाले खोलीकरणासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, जलसंपदा अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा सचिव डॉ. संजय बेलसरे, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर; प्रकल्पाला गती देणार : महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, चिंचघाट उपसा सिंचन योजना ही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे. योजनेला मंजुरी मिळून 16 वर्षे उलटली, तरीही ती पूर्ण न होणे गंभीर बाब आहे. या योजनेसाठी सर्व परवानग्या आणि मंजुरी मिळवण्यासाठी मी स्वतः राज्यपालांकडे जाऊन प्रयत्न करेन. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असतानाही या प्रकल्पासाठी सभागृहात आवाज उठवला होता आणि सभागृह अर्धा तास बंद ठेवले होते. कुही तालुक्यासारख्या अवर्षणग्रस्त भागातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेमुळे पाणी मिळणार आहे. गेली अनेक वर्षे त्यांची होणारी परवड थांबवण्यासाठी हा प्रकल्प तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण : चिंचघाट उपसा सिंचन योजनेमुळे कुही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. या योजनेमुळे पाण्याची उपलब्धता वाढेल, शेतीचे उत्पादन सुधारेल आणि दुष्काळी भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढेल. महसूल मंत्र्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि तातडीच्या कार्यवाहीच्या निर्देशांमुळे हा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.
चिंचघाट उपसा सिंचन योजना म्हणजे काय ?
चिंचघाट उपसा सिंचन योजना ही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत नागपूर जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा उपखोऱ्यातील एक महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना नागनदी आणि कन्हान नदीच्या संगमाच्या खालच्या बाजूस, कुही तालुक्यातील सावंगी गावाजवळ कन्हान नदीच्या उजव्या तीरावर प्रस्तावित आहे. योजनेमुळे कुही तालुक्यातील 18 गावांतील 3,715 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या योजनेमुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.

