मान्सून अरबी समुद्रात दाखल : पुढील महिन्यात लावणार महाराष्ट्रात हजेरी
नागपूर : उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अंदमानातून आता अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिला तर केरळमध्ये २७ मे ते १ जूनदरम्यान दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात साधारण ५ जूनला दाखल होईल आणि १५ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे.
दरम्यान मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. कोकण आणि आजबाजूच्या परिसरात हवेच्या वरच्या पट्ट्यात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याने पुणे शहराला पुढील चार दिवस ‘यलो’ अलर्ट दिला आहे. तसंच पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यताही वर्तविली आहे.

अंदमानमध्ये दाखल झालेल्या मान्सूनने आज अरबी समुद्रात धडक दिली आहे. मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. अंदमान, बंगालचा उपसागर आणि मालदीवच्या काही भागात मान्सून पुढे सरकताना दिसत आहे.’ दरम्यान, सध्या राज्यावर अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. त्यामुळे शेतीचं मोठे नुकसान झालं असून बळीराजा चिंतेत आहे. त्यातच पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर जाणं टाळावं आणि झाडाखाली उभे राहू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

