Maharashtra Municipal Election: महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले; ‘या’ दिवशी होणार निवडणुका
- राज्यातील प्रलंबित २९ महापालिका निवडणुकांची घोषणा
- २ हजार ७८९ जागांसाठी निवडणुका
- निवडणुकीसाठी ९६ हजार ६०५ कर्मचारी काम करतील
Maharashtra Municipal Election Latest News: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित २९ महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे. महापालिका निवडणुका २९ जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आजची पत्रकार परिषद ही महापालिका निवडणुकांसाठी आहे. २ हजार ७८९ जागांसाठी निवडणुका होत आहेत. आजपासून आचारसंहिता लागू करण्यात येत आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम खालीलप्रमाणे-
अर्ज दाखल कऱण्याची तारीख- २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर

छाननी- ३१ डिसेंबर
उमेदवारी माघार- २ जानेवारी २०२६
चिन्हवाटप अंतिम उमेदवार यादी- ३ जानेवारी
मतदानाची तारीख- १५ जानेवारी २०२६
मतमोजणी- १६ जानेवारी २०२६
१८ महापलिकांची २०२२ मध्ये मुदत संपली. राज्यातील २८ महापालिका या बहुसदस्यीय आहेत. जात वैधतेसाठी सदस्यांनी ६ महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. आगामी निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ या तारखेचीयादी अंतिम यादी म्हणून ग्राह्य धरली जाईल निवडणुकीसाठी ९६ हजार ६०५ कर्मचारी काम करतील. गुलाबी मतदार केंद्रावर सर्व महिला कर्मचारी असतील.
एकूण मतदार ३ कोटी ४८ हजार मतदार
मतदान केंद्र – ३९, १४७
मुंबईसाठी १० हजार १११ मतदान केंद्र
कंट्रोल यूनिट – ११ हजार ३४९
बॅलेट यूनिट – २२ हजार
निवडणूक खर्च मर्यादा- 15 लाख
या निवडणुकीसाठी मतदार यादीतील संभाव्य दुबारमतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. घरी जाऊन या मतदारांची पडताळणी करण्यात आली आहे. कोणत्याही मतदाराला त्याच्या मतदार संघाशिवाय दुसऱ्या मतदार संघातील मतदान केंद्रावर मतदान करू दिले जाणार नाही. मुंबईत ११ लाख संभाव्य दुबार मतदार होते. काही ठिकाणी महापालिकांमध्ये संभाव्य दुबार मतदारांची संख्या अधिक होती. संभाव्य दुबार मतदारांसमोर डबल स्टार करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील प्रस्तावित 29 महापालिका निवडणुका
ओबीसी आरक्षणामुळे गेल्या पाच ते सात वर्षांपासून किंवा त्या पेक्षा जास्त काळापासून राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका लांबल्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. त्यासाठी 2 डिसेंबर २०२५ रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राज्यातील २७ महापालिकांची मुदत संपली असून, नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी या दोन महापालिकांच्या पहिल्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे एकूण २९ महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे.
या महापालिका निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदान यादी ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही मतदार यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेली असल्याने, त्यामधील नावे वगळण्याचे किंवा बदल करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाहीत, असेही अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे मतदार यादीवरून होणारे वाद टळण्याची शक्यता असून, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखली जाईल, असा प्रशासनाचा दावा आहे.आगामी महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला या निवडणुकांमध्ये मान्यता देण्यात आलेली नाही.
तसेच, ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नाही, अशा उमेदवारांना निवडणूक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. ठरलेल्या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित उमेदवारांविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख महापालिकांतील आकडेवारी जाहीर
राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांमधील ताजी आकडेवारी समोर आली असून, बृहन्मुंबई महानगरपालिकेचा आकडा सर्वाधिक २२७ इतका आहे. त्याखालोखाल पुणे (१६२) आणि नागपूर (१५१) या महापालिकांचा क्रमांक लागतो.
महापालिकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे —
- बृहन्मुंबई – २२७
- भिवंडी-निजामपूर – ९०
- नागपूर – १५१
- पुणे – १६२
- ठाणे – १३१
- अहमदनगर – ६८
- नाशिक – १२२
- पिंपरी-चिंचवड – १२८
- औरंगाबाद – ११३
- वसई-विरार – ११५
- कल्याण-डोंबिवली – १२२
- नवी मुंबई – १११
- अकोला – ८०
- अमरावती – ८७
- लातूर – ७०
- नांदेड-वाघाळा – ८१
- मीरा-भाईंदर – ९६
- उल्हासनगर – ७८
- चंद्रपूर – ६६
- धुळे – ७४
- जळगाव – ७५
- मालेगाव – ८४
- कोल्हापूर – ९२
- सांगली-मिरज-कुपवाड – ७८
- सोलापूर – ११३
- इचलकरंजी – ७६
- जालना – ६५
- पनवेल – ७८
- परभणी – ६५







