जीबीएसचा धोका वाढला; पुणे, मुंबईनंतर नागपुरात एका रुग्णाचा मृत्यू

जीबीएसचा धोका वाढला; पुणे, मुंबईनंतर नागपुरात एका रुग्णाचा मृत्यू

नागपूर: गुईलेन बॅरे सिंड्रोम आता राज्यभर पाय पसरताना दिसत आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूरनंतर आता नागपुरात जीबीएस रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील जीबीएस रुग्णाच्या मृत्यूचं हे पहिलच प्रकरण आहे. राज्या आतापर्यंत जीबीएसमुळे 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्यातील 7 रुग्णांचा समावेश आहे.

गुईलेन बॅरे सिंड्रोममुळे नागपुरच्या पारडी येथील रहिवाशी असलेल्या 45 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शासकीय वैद्यकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती असताना शुक्रवारी रात्री या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या दोन्ही हात आणि पायाना पक्षाघात झाला होता. तर न्युमोनिया झाल्याने श्वसनाला त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. जीबीएसचे आणखी दोन रुग्ण अतिदक्षता विभागात भरती असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

आजाराची सर्वसाधारण लक्षणे

  • अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा लकवा येणं.
  • अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे.
  • डायरिया (जास्त दिवसांचा)

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

  • पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी उकळून घेणे.
  • अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
  • वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
  • शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवणं टाळावे.
  • नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. लक्षणे आढळल्यास जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा