वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
शेतात गेला असताना केला हल्ला
माटोरा शेतशिवारातील घटना

भंडारा :- भंडारा तालुक्यातील माटोरा शिवारात वन बिट क्र.९७ मध्ये दि.२४ जानेवारी रोजी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतात उन्हाळी धानाचे पर्हे टाकण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेलेल्या शेतकर्यावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केल्याची घटना घडली. राजू ताराचंद सेलोकर (३५) रा. माटोरा असे मृत शेतकर्याचे नाव आहे. वाघाच्या बंदोबस्ताकरिता वनविभागाच्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याने परिसरातील शेतकरी नागरिकांत वनविभागाविरोधात रोष व्यक्त केला जात असून नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
भंडारा तालुक्यातील माटोरा परिसरात करचखेडा उपसा सिंचनाचे पाणी येत असल्याने अनेक शेतकरी उन्हाळी धानाचे उत्पादन घेत आहेत. दोन-तीन दिवसांअगोदर कालव्याला उपसा सिंचनाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शेतकरी धानपर्हे भरण्याच्या लगबगीत आहेत. माटोरा येथील राजू सेलोकर हा शेतकरी धानपर्हे टाकण्यासाठी दि.२४ जानेवारी रोजी सकाळी शेतात गेला होता. धानपर्हे टाकण्यासाठी ट्रॅक्टरचालकाला सांगितले होते. ट्रॅक्टर शेतात गेला तेव्हा राजू सेलोकर शेतात दिसून आला नाही. दबा धरून असलेल्या वाघाने राजू सेलोकर या शेतकर्यावर हल्ला चढवून त्याला शेतापासून ५०० मीटर अंतर फरफटत नेले. राजू हा शेतात दिसून न आल्याने ट्रॅक्टर परत येऊन याची माहिती मृतकाच्या भावाला दिली. मृतकाचा भाऊ शेतात गेला असता कपड्याचे तुकडे व रक्त सांडल्याचे दिसून आले व शंका मनात अधिकच बळावत गेली. गावकर्यांच्या मदतीने रक्त सांडत गेलेल्या ठीकाणावरून शेतापासून जवळपास ५०० मीटर अंतरावर राजू सेलोकर याचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आला.
घटनेची माहिती कारधा पोलिसांना मिळताच ठाणेदार गणेश पिसाळ, पोहवा रणधीर डोंगरे, पोशि भोगे, प्रमोद आरीकर तसेच घटनास्थळी वनविभागाचे सहाय्यक उपवन संरक्षक सचिन निलख, वनपरिक्षेत्र अधिकारी विलास बेलखोडे, क्षेत्रसहाय्यक ए.डी.वासनिक, बीटरक्षक माटोरा उमा कोरे तसेच भंडारा येथील वनविभागाचे जलद कृती दलाचे अनिल शेळके, सचिन कुकडे, अजय उपाध्याय, तुकाराम डावखोरे व इतर कर्मचार्यांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी गावकर्यांनी वनविभागावर रोष व्यक्त करीत जवळपास अर्धा एक तास मृतदेह उचलू दिले नाही. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वनविभागाकडून घटनास्थळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी गावातील माजी पंस सदस्य डॉ.सचिन निंबार्ते, निखील वाघाडे, राहूल तितिरमारे, विजय सेलोकर, दिनेश सेलोकर, सरपंच किशोर िंनबार्ते, पप्पू जगनाडे, सुभाष ठवकर व मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
यावेळी मृतक परिवार तसेच गावकर्यांकडून मृतक शेतकर्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत, जंगलासभोवताल तारेचे कुंपण, शेतकर्यांच्या शेतात वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्यास शेतकर्यांवर गुन्हे दाखल होऊ नये, कालव्यावरील झाडेझुडपी असल्याने वन्यप्राणी दिसत नाही तेव्हा कालव्यावरील झाडीझुडपी तोडण्यात यावे तसेच नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. वनविभागाच्या लेखी आश्वासनानंतर कुटुंबिय व गावकर्यांकडून प्रेत शवविच्छेदनाकरिता उचलू देण्यात आले. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताकरिता वनविभागाच्या उपाययोजना कुचकामी ठरत असल्याने शेतकरी नागरिकांत रोष व्यक्त केल्या जात आहे.



