नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू : लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू

नूतन वर्षात नवीन वीजबिल प्रणाली सुरू : लवकरच स्मार्ट मीटरसाठी निर्णय होणार लागू

मुंबई : केंद्र सरकारने आरडीएसएस योजनेअंतर्गत महावितरण कंपनीला 29 हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असून त्यासाठी सर्व ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याची अट घातली आहे. सुरुवातीला स्मार्ट मीटर बसविण्याची अट होती, मात्र आता पाच कंपन्यांकडून स्मार्ट बसविणार आहेत. त्यानुसार नवीन वर्षांत स्मार्ट मीटरसाठी नवीन वीजबिल प्रणाली लागू करण्याचा निर्णय महावितरण कंपनी प्रशासनाने घेतला आहे.

नवीन वीजजोडणीसाठी तसेच सदोष आणि नादुरुस्त मीटर बदलताना आधुनिक तंत्रज्ञानाचे टीओडी वीजमीटर वीज ग्राहकांकडे लावले जाणार आहे. हे मीटर प्रीपेड नसून, सध्याच्या मीटरप्रमाणे पोस्टपेड म्हणजे वीज वापरानंतर दरमहा बिल या पद्धतीचे राहणार आहे. त्यामुळे सध्याच्या बिलिंग प्रणालीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. नव्या टीओडी मीटरमुळे ग्राहकांना त्यांचा वीजवापर नियमितपणे मोवाईल फोनवर वीजग्राहकांसाठी स्वस्त वीज दराच्या स्लॅबसाठी टीओडी (टाईम ऑफ डे) प्रणाली, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नेट मिटरिंग, स्वयंचलित व अचूक मीटर रीडिंग तसेच वीजवापर किती झाला याची प्रत्येक मिनिटाला मोबाईलवर माहिती कळू शकणार आहे. कमी वीज वापरणाऱ्यांना कमी दर आणि जास्त वीज वापरणाऱ्या श्रीमतांना अधिक दर असे वीजदराचे सूत्र यापुढेही कायम राहणार आहे.

महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीजदरनिश्चिती प्रस्तावात घरगुती ग्राहकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वीज वापरल्यास सवलत देऊ केली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी टीओडी मीटर आवश्यक आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले. नव्या  डिजिटल वीजमीटरमुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेचे अचूक व स्वयंचलित रीडिंग होणार आहे. ग्राहकांना स्वतःच्या मोबाईलवर विजेचे मीटर रीडिंग प्रत्येक मिनिटाला पाहण्याची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे दरमहा बिलिंग आणखी अचूक होणार आहे. मीटरचा फोटो अस्पष्ट घेणे, विविध कारणांमुळे मीटर रीडिंग घेता न येणे किंवा नादुरूस्त शेऱ्यामुळे सरासरी किंवा अंदाजे युनिटच्या वीजबिलाचे सध्याचे प्रकार बंद होणार आहे. स्मार्ट मीटर बसविणाऱ्या ग्राहकांची वीजबिले पूर्वीपेक्षा वाढलेली नाहीत, उलट १० टक्के सवलत देण्यात आली असून ती पाच वर्षे लागू राहील.