वीज कोसळून बैलजोडी मृत्युमुखी : पेरणीच्या वेळेवर शेतकरी संकटात ; लाखो रुपयाचे नुकसान

वीज कोसळून बैलजोडी मृत्युमुखी : पेरणीच्या वेळेवर शेतकरी संकटात ; लाखो रुपयाचे नुकसान

टाकळघाट :- टाकळघाट पासून जवळपास १५ की मी अंतरावरील व हिंगणा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आजनगाव येथील शेतकरी गंगाधर सूर्यभान पेंदाम यांच्या मौजा किन्हाळा (रिठी) येथील शेतात असलेल्या गोठ्याच्या समोरील झाडाला बांधून असलेल्या बैलजोडीच्या अंगावर वीज कोसळून बैलजोडी मृत्युमुखी पडल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून अगदी पेरणीच्या वेळेवर शेतकरी संकटात सापडला आहे.

सध्या रोहिणी नक्षत्र सुरु असून ७ जून पासून मृग नक्षत्राला सुरुवात होईल. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. अशातच सगळीकडे अवकाळी पावसाने थैमान घातले असून तो कधी, कुठे पडेल याचा नेम नाही. याचीच प्रचिती सोमवार दि २६ मे ला आजगाव शिवारात घडली. गंगाधर पेंदाम यांच्या शेतात वखरण सुरु असतांना अचानक दुपारी ४:०० वाजताच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. म्हणून त्यांनी वखरण बंद करून बैलजोडी गोठ्यासमोरील झाडाला बांधून ते गोठ्यात बसले असता अचानक त्यांच्या गोठ्याजवळ वीज पडली त्यात त्यांची लाखो रुपयाची बैलजोडी जागीच मृत्युमुखी पडल्याचे पाहून शेतकऱ्याने हंबरडाच फोडला.

सध्याचाघडीला निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतात, पण निसर्गाची अवकृपा सातत्याने होत असल्याने पदरी निराशाच येत आहे. आधीच अस्मानी, सुलतानी संकटाने बेजार असलेला शेतकरी कशी तरी कंबर कसून शेती करायला तयार होतो, त्यात जर अगदी पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्याची बैलजोडी मृत्य होणे म्हणजे दारिद्राच्या दृष्टचक्रात पडल्याची स्थिती या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर शासनाकडून शेतकऱ्याला मदत मिळावी अशी मागणी घोडेघाट परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.