पचखेडीच्या इंडियन बँकेत व्यवस्थापक नाही ; शेतकऱ्यांचे पीककर्ज रखडले….
स्वप्नील खानोरकर (विशेष प्रतिनिधी)
पचखेडी :–राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या इंडियन बँक पचखेडी शाखेतील व्यवस्थापक पद गेल्या पंधरा दिवसांपासून रिक्त असल्याने बँकेचे व्यवहार अक्षरशः ठप्प झाले आहेत. पीककर्ज, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, खातेविषयक सेवा आदी सर्वच कामांवर गंडांतर आले असून, हजारो खातेदारांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पूर्वीचे व्यवस्थापक सुन्नीस टोपो यांची बदली झाल्यानंतर पुणे वरून स्केल थ्रीच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्याने नियुक्ती नाकारल्यामुळे सध्याही हे महत्त्वाचे पद रिक्तच आहे. दरम्यान, दुसरा कोणताही व्यवस्थापक नेमण्यात आलेला नाही. परिणामी शेतकरी, नोकरदार, पेन्शनर्स यांना आवश्यक त्या सेवा वेळेत मिळत नाहीत.आधीच तीन-चार कर्मचाऱ्यांच्या जीवावर बँकेची धावपळ सुरू आहे. रोखपाल, एक अधिकारी, लिपिक व शिपाई एवढ्याच मोजक्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने कामकाज चालवले जात आहे. दोन कर्मचारी रोजंदारीवर नेमले असले तरी व्यवस्थापकाअभावी निर्णयात्मक कामे रखडली आहेत.
शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी आवश्यक असलेली पीककर्जे वेळेत मंजूर व्हावीत, यासाठी शेतकऱ्यांची बँकेभोवती चकरा सुरू आहेत. मात्र, प्रस्ताव सादर करूनही मंजुरी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. व्यवस्थापकपद रिक्त असल्याने बँकेतील व्यवहारांवर थेट परिणाम झाला आहे. हजारो पुनर्वसनीत गावकऱ्यांची खाती याच बँकेत असून, शासनाच्या विविध योजना, पेन्शन, शेतकरी अनुदाने याच शाखेतून वितरित होतात. मात्र सध्या कोणतेही काम होत नाही.
ऑनलाइन व फोन बँकिंगच्या सोयी असल्या तरी पीककर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज यांसारख्या सेवा व्यवस्थापकाच्या मंजुरीशिवाय शक्य नाहीत. त्यामुळे व्यवस्थापक नसल्याने व्यवहार ठप्प झाल्याची स्पष्ट झळ ग्राहकांना बसत आहे.
ही स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ कार्यालयाने याची तातडीने दखल घेऊन पचखेडी शाखेत लवकरात लवकर व्यवस्थापक नियुक्त करावा, अशी जोरदार मागणी ग्राहक आणि शेतकऱ्यांकडून होत आहे.

