वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार ; शेतात पाइप बदलवण्यासाठी गेले असता केला हल्ला   

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार ; शेतात पाइप बदलवण्यासाठी गेले असता केला हल्ला   

भंडारा : विद्युत पुरवठा सुरू होण्याआधी शेतात पाईप बदलवून येतो असे पत्नीला सांगून शेतावर गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला आणि ठार केले. ही घटना लाखांदूर तालुक्यातील खैरी पट गावातील शेतशिवरात काल रात्रीच्या सुमारास घडली. डाकराम देशमुख (४३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली.

लाखांदूर तालुक्यातील खैरी/पट, विहीरगाव, डांभेविरली व टेंभरी या गावांमध्ये मागील १५ ते २० दिवसांपासून वाघाचे दर्शन होत असून अनेक जनावरांची शिकार झाली आहे. अशातच खैरी/पट येथील शेतकरी डाकराम देशमुख स्वतःच्या मालकीच्या शेतावर धानपिक व मका पिकाची पाहणी आणि मोटार पंपाचे पाईप बदलवण्यासाठी सायंकाळी ५ वाजता सुमारास गेले होते, मात्र तेथे दबा धरून बसलेल्या वाघाने डाकराम यांच्यावर हल्ला केला आणि ३५ ते ४० फूट अंतरावर त्यांना मक्याच्या शेतात ओढत नेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर डाकराम बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान मध्यराञीच्या सुमारास लाखांदूर वनपरीक्षेञ अधिकारी कार्यालयाची चमु व पोलीस प्रशासन यांनी डाकराम देशमुख यांचे शोधकार्य सुरू केले.

शेतात डाकराम यांची सायकल दिसल्यानंतर खैरी/पट स्मशानभूमी येथे त्यांचा मृतदेह अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला. वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याचे लक्षात आले. यानंतर शवविच्छेदनासाठी डाकराम यांचा मृतदेह आणण्यात आला. वन विभाग कार्यालयाच्या समोर शेकडो संतप्त गावकऱ्यांनी गर्दी केली होती. अशातच लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागाने व वनविभाग कर्मचाऱ्यांनी नागरिकांना शांत केले. यावेळी वन विभागाकडून देशमुख कुटुंबाला ५० हजारांची आर्थिक मदत करण्यात आली.