नागपुर जिल्हा ‘कूल-कूल`; तापमानाचा पारा 8 अंशांपर्यंत घसरला, घराबाहेर पडणे झालं कठीण

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा उन्ह तर सकाळी आणि रात्री थंडीचा कडाका जाणवत आहे. असे असताना जिल्हयात सकाळच्या वातावरणातील गारवा चांगलाच वाढत आहे. किंबहुना विक्रमाकडे पुढे जात असल्याचे चित्र आहे. हवामान खात्यानुसार, विदर्भात नागपूरची बुधवारी सर्वाधिक थंड शहर म्हणून नोंद झाली. या मोसमातील सर्वाधिक कमी ८ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते.
गेल्या चार दिवसांपासून पारा किमान पातळी गाठत आहे. त्यामुळे नागरिक जॅकेट, स्वेटरबंद झाले आहेत. कमाल तापमान २९-३० दरम्यान असल्याने दुपारी नागरिकांना किंचित दिलासा मिळत असला तरी सायंकाळी थंडीत वाढ होत असल्याने शेकोट्याही दिसत आहे. नागपूरनंतर गोंदिया ८.४ अंशासह दुसऱ्या तर यवतमाळ ८.८ अंशासह तिसरे थंड शहर ठरले. गेल्यावर्षी १४ डिसेंबरला ७ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरले होते. त्यामुळे आजची तारीख लक्षात घेता थंडीने गेल्यावर्षीचा विक्रम मोडित काढण्याकडे वाटचाल सुरू केल्याचे दिसून येत आहे. डिसेंबरच्या शेवटी तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअस असते. ३० डिसेंबर २०१८ रोजी नागपूरचे तापमान ३.५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, जे मागील ५० वर्षांतील सर्वात कमी तापमान होते.

यंदा डिसेंबरच्या सुरुवातीलाच किमान तापमान ८ पोहोचल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. बुधवारी दिवसाला थोडे उन्ह तापले. त्यामुळे कमाल तापमान बुधवारी ३०.२ अंशापर्यंत गेले. मात्र, सायंकाळ होताच पुन्हा थंडीने जोर धरला. थंडीमुळे नागरिकांचे घरातून निघणेही बंद झाले. घरांमध्ये नागरिकांनी स्वेटर, मफलर, टोपऱ्यांमध्ये स्वतःला बंद करून घेतले आहे. सर्वत्र नागरिक शेकोटीजवळ हात शेकताना दिसून आले.






