दारू पितांना झालेल्या किरकोळ वादातून शेजाऱ्यानेच केली ३० वर्षीय युवकाची हत्त्या

दारू पितांना झालेल्या किरकोळ वादातून शेजाऱ्यानेच केली ३० वर्षीय युवकाची हत्त्या

नागपूर : शहरातील पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जय दुर्गा नगरमध्ये एका किरकोळ वादातून घडलेल्या खूनाच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेत मोहन मिश्रा (वय अंदाजे ३०) या तरुणाची परिसरातील ओळखीच्या चार जणांनी मिळून चाकूने वार करत निर्घृण हत्या केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत या प्रकरणातील चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक मोहन मिश्रा हा भांडेवाडी परिसरात राहणारा होता आणि तो आरा मशीनवर काम करत. त्याला दारूचे व्यसन होते. आरोपी अभिषेक कांबळे, शेख फैजान फहीम शेख, चंद्रशेखर इंद्रमणी आणि राजकुमार इंद्रमणी हेही त्याच परिसरात राहतात. यातील अभिषेक कांबळे हा पुण्यातील एका खाजगी कंपनीत काम करत असून काही दिवसांपूर्वीच तो नागपुरात घरी परतला होता. रात्री मोहन, अभिषेक आणि फैजान एकत्र बसून दारू पित होते. याचवेळी त्यांच्यात किरकोळ वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अभिषेकने मोहनला शिवीगाळ केली. यावेळी मोहनने प्रतिक्रिया दिल्याने त्यांच्यात झटापट झाली आणि अभिषेक किरकोळ जखमी झाला. संतप्त झालेल्या अभिषेकने आपल्या मित्र फैजानच्या मदतीने मोहनवर चाकूने सपासप वार केले यात मोहन गंभीर जखमी झाला.

घटनेच्या वेळी चंद्रशेखर इंद्रमणी आणि त्याचे वडील राजकुमार इंद्रमणी हेही तिथे उपस्थित होते. त्यांनी आरोपींना मोहनला मारण्यासाठी उत्तेजित केल्याचे समजते. पोलिसांनी त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी म्हणून अटक केली आहे. गंभीर जखमी अवस्थेत मोहन मिश्राला परिसरातील रहिवाशांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पारडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि चारही आरोपींना अटक केली.